Swatantra Nagrik
![]() |
Swatantra Nagrik |
शिवजयंतीच्या मुहूर्तावर ‘स्वतंत्र नागरिक’ हे साप्ताहिक लोकांना अर्पण करताना मला आनंद होतो आहे. संपूर्ण जगाच्या इतिहासात ‘हे राज्य रयतेचं आहे’ अशी ‘हिंदवी स्वराज्या’ची संकल्पना सांगणार्या आणि प्रत्यक्षात आणणार्या शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीहून जास्त चांगला मुहूर्त मिळणार नाही. त्याच वेळी पहिल्या अंकावरची अधिकृत तारीख – रविवार २३ मार्च – भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्या बलिदानाच्या पुण्यस्मरणाचा पवित्र दिवस.
असा दुग्धशर्करा योग साधून ‘स्वतंत्र नागरिक’ या साप्ताहिक वृत्तपत्राचा पहिला अंक लोकार्पण करत आहोत, याचा अर्थातच आनंद आहे. आता याला जनाधार लाभला तर साप्ताहिक आणि सामाजिक चळवळ चालू राहील. नाही, तर मला माझी चूक किंवा मर्यादा मान्य आहे.
IAS होण्यापूर्वीची १० वर्षं पूर्ण वेळचा कार्यकर्ता म्हणून काम करताना आणि नंतर १० वर्षं IAS अधिकारी – म्हणजे कार्यकर्ता अधिकारी म्हणून काम करताना मला ‘सामान्य माणसाच्या सबलीकरणा’ची (Empowerment) संकल्पना समजली. त्यासाठी व्यक्तीचं ‘चरित्रनिर्माण’ आणि व्यवस्थेचं ‘परिवर्तन’ या गोष्टी बरोबरीनं हातात हात गुंफून पुढे सरकायला हव्यात हेही लक्षात आलं. तेंव्हा चरित्रनिर्माण आणि व्यवस्थापरिवर्तन, शिक्षण आणि राजकारण, रचनात्मक कार्य आणि संघर्ष इत्यादी सर्व द्वैतं संपली. जसं आणि जेवढं जाणवलं तेवढं सांगत गेलो. त्याचा आधी तयार झाला ग्रंथ ‘स्वतंत्र नागरिक’. आता हे साप्ताहिक वृत्तपत्र ‘स्वतंत्र नागरिक’ – दोन्हींद्वारा लोकशाहीच्या एका नव्या स्तंभाची उभारणी करता येईल – विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांच्याप्रमाणेच आधुनिक लोकशाहीचा हा मुख्य स्तंभ – स्वतंत्र नागरिक.
स्वतंत्र नागरिक म्हणजे या देशाचा एक जागरुक नागरिक. तो कोणत्याही पोथीनिष्ठ, पक्षीय किंवा राजकीय विचारसरणीला बांधलेला नसेल. किंवा असेलही. पण तो सार्वजनिक जीवनामध्ये सक्रीयरित्या सहभागी असेल. ते केवळ स्वत:ला काही पद, पैसा, कीर्ती, सत्ता हवी म्हणून नव्हे, तर वैयक्तिक आणि सामूहिक स्वार्थामधलं अद्वैत त्याला समजलं, म्हणून.
अशा स्वतंत्र नागरिकासाठी आणि नागरिकाच्या स्वातंत्र्यासाठी साप्ताहिक वृत्तपत्राचं एक साधन सुरू करत आहोत. ते नि:पक्षपाती, परखड आणि अभ्यासू असेल असा आमचा प्रयत्न आहे. इथे स्वत:च्या भूमिका आणि विचारांची स्पष्टता बाळगतानाच सर्व विचारांचं स्वागत असेल, आदर असेल. मनोरंजन म्हणजे उथळ, थिल्लरपणा नाही. स्पष्टवक्तेपणा म्हणजे उर्मट तुसडेपणा नाही. अभ्यासू मांडणी म्हणजे रटाळ, बोअर-पणा नाही आणि सामाजिक चळवळीचं साधन म्हणजे प्रचारकीपणा नाही. असा सर्व समतोल साधण्याची आमची दिशा आहे. ती जमते आहे की नाही हे तुम्हीच सांगा आम्हाला.
ऐतिहासिक ठरू शकतील अशा लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली असतानाच हे साप्ताहिक वृत्तपत्र लोकार्पण करत आहोत. आमचं सर्वांना किमान आणि समान आवाहन आहे – VOTE – मतदान केलंच पाहिजे. तरच आपल्याला चांगलं सरकार मिळालं पाहिजे असं म्हणण्याचा, न मिळालं तर त्या सरकारवर टीका करण्याचा, पुढे ते सरकार लोकशाही मार्गानं बदलण्याचा अधिकार आहे. आपण सावधपणे, जागरुकपणे मतदान केलं – तर आपल्याला चांगलं सरकार मिळेलही. त्यासाठी पक्ष किंवा विचारधारांच्या वर उठत एक राष्ट्रीय सहमतीचा कार्यक्रम मांडायचाही प्रयत्न आम्ही सुरू करतो आहोत. तो म्हणजे ‘स्वतंत्र नागरिकांचा जाहीरनामा’.
कागदावरचा छापील अंक तुमच्या हातात ठेवतानाच इंटरनेट आवृत्ती सुद्धा सुरू करतो आहोत. या साप्ताहिक वृत्तपत्राला आणि सामाजिक चळवळीला आपल्याकडून शुभेच्छा, सहकार्य, सहभाग लाभावा ही आणि हा पहिला अंक लोकार्पण करतो.
-स्वतंत्र नागरिक : ग्रंथ-साप्ताहिक-चळवळ सुरु करण्यामागील धर्माधिकारी सरांनी मांडलेली भूमिका.
स्वतंत्र नागरिक चा इंटरनेट वरील पत्ता
www.swatantranagrik.in
www.facebook.com/swatantranagrik
No comments:
Post a Comment