Glorious History of Marathas
www.dasbodh.com
मराठा इतिहासाची पार्श्वभूमी
मराठ्यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी थेट पहिल्या सहस्रकातील महम्मद बिन कासीमच्या हिंदुस्थानावरील स्वारीपर्यंत जाते. तर इतिहासाची सुरुवात ही शहाजी राजे भोसले यांच्या इतिहासापासून सुरु होते. महाराष्ट्र धर्मावर होणारे परकीय आघात परतवून लावता लावता स्वधर्माचे राज्य स्थापन करण्याचे दोन अयशस्वी प्रयत्न शहाजीराजे यांनी केलेले आढळतात. शिवाजी महाराजांच्या पुढील कार्याची मुख्य प्रेरणा शहाजीराजेच असावेत हे यावरून लक्षात येते.शिवराय तसे घडत आहेत की नाही हे जाणीवपूर्वक पहाण्याचे व त्यांना तसेच वाढविण्याचे महान कार्य राजमाता जिजाऊ आईसाहेब यांनी चोख बजावलेले आढळते. या कामी त्यांना स्वराज्याचे निष्ठावंत सेवक जसे की दादाजीपंतकोंडदेऊ आदींची मोलाची साथ लाभलेली दिसते.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने
मुळात मराठा इतिहासाची दुर्दैवी गाथा अशी की आपल्याकडॆ इतिहास नोंदवून ठेवण्याची पद्धत पुर्वापार नाही, या उलट इंग्रज मात्र ओळ अन् ओळ टिपून ठेवीत असत त्यामुळे महाराजांचा इतिहास जेंव्हा इंग्रज इतिहासकारांनी लिहायला सुरुवात केली तेंव्हा आम्हाला जाग आली. तो इतिहास विकृत असणे स्वाभाविक होते कारण १७ व्या शतकापासून महाराजांनी साम्राज्यवादी इंग्रजांची अशी कोंडी करून ठेवली होती की भारताचा मराठ्यांकडून ताबा घ्यायला १८१८ साल उजाडावे लागले. रॉलिन्सन,ग्रांट डफ़,ताकाखाव,ब्रिग्ज आदि पाश्चात्य लेखकांनी जेंव्हा असे लिखाण सुरु केले तेंव्हा मात्र नवीनच इंग्रजी शिकलेल्या आपल्या देशातील समाजात अशांतता पसरू लागली.यावर काही उपाय केला पाहिजे हे जाणून न्यायमूर्ती रानडे यांनी अनेक बुद्धीवंतांची एक सभा घेऊन त्यात यावर खल झाला व असे ठरले की इंग्रजांना त्यांच्याच पद्धतीने उत्तर द्यावयाचे म्हणजे कसे? तर इतिहासलेखनाच्या त्यांच्या पद्धतीचा अभ्यास करून त्या पद्धतीने शास्त्रशुद्ध, तर्कनिष्ठ, वस्तुनिष्ठ व एतद्देशीयांच्या द्रूष्टीकोनातून इतिहासाचे पुनर्लेखन करावयाचे. न्यायमूर्ती रानड्यांनी१८८३ साली Rise if the Maratha power हा ग्रंथ लिहून या कार्याचा नारळ फ़ोडला.यानंतर असा शास्त्रशुद्ध अभ्यास करणा-या मराठ्यांची एक फ़ळीच महाराष्ट्रात तयार झाली.
यातील आघाडीचे खंदे वीर होते इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे (धुळे), यांनी उभे आयुष्य पणाला लावीत मराठ्यांच्या इतिहासाची अनेक साधने, पत्रे, सनदा, बखरी, कागदपत्रे, दानपत्रे, महजरा गोळा करून “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” नावाचे तब्बल २३ अजस्र खंड लिहिले! यशिवाय ग.ह. खरे, वा.सी. बेंद्रे, गो.सी. सरदेसाई, न.चिं. केळकर, डी.बी. पारसनीस, शं.श्री. देव, द.वि. आपटे अशा इतिहासकारांची एक मोठी फ़ळीच या महाराष्ट्रात निर्माण झाली. आज आपल्याला शिवाजी महाराजांचा जो काही इतिहास ज्ञात आहे तो याच लोकांच्या अफ़ाट पायाभूत कार्यामुळे.
शिवाजी महाराज
मराठा इतिहासाचा अद्वितीय शासक म्हणाजे छत्रपती शिवाजी महाराज. जगभरातील प्रत्येक भाषेत शिवरायांवर विपुल लिखाण झालेले आढळते. आजही भारताचा इतिहास म्हटले की पहिले नाव शिवाजी महाराजांचे येते. SHIVAJI या शब्दाचे गुगल मानांकन आजही अन्य कोणत्याही भारतीय नेत्याहून आधीक आहे! शिवरायांच्या इतिहासासंदर्भात परकीय (फ़ारसी, अरबी, डच, फ़्रेंच, इंग्रजी, चिनी)साधनेही विपुल उपलब्ध आहेत.गनिमी काव्याच्या तंत्रामुळे आजही जगातील सैन्यदलांना शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचे (warfare)आकर्षण आहे.शिवरायांच्या इतिहासामध्ये धर्मकारण, राजकारण व समाजकारण अशा तीन अंगांनी त्यांच्या कार्याचा धांडोळा घ्यावा लागतो. शिवरायांना सुमारे ३५ वर्षांचे सामरिक आयुष्य लाभले, या काळात त्यांनी २३० लढाया केल्या व त्यात केवळ सात पराभव आहेत. शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करताना किल्ले, सह्याद्री व महाराष्ट्राच्या भूगोलाचा अभ्यास स्वाभाविकपणेच येतो.
संभाजी महाराज
शिवरायांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेले हे युवराज पुढे महाराजांहूनही काकणभर सरस ठरल्याचा दाखला इतिहासच देतो! आग्र्याहून सुटका असो वा अन्य लढाया, आपल्या वडिलांच्या निर्णयक्षमतेचा जवळून अभ्यास संभाजीराजांना घडलेला दिसतो. त्यामुळॆच केवळ ९ वर्षात १३० लढाया करून त्या सर्व युद्धांत अजिंक्य रहाण्याचा महान पराक्रम शंभूराजे करतात! त्यातही सर्व शत्रू एकत्रीत झालेले असताना! कारण शिवाजी महाराज एकावेळी एकच शत्रू अंगावर घेत हे आता शत्रूंना कळाल्याने ते सावध झाले होते! फ़ाल्गुन वद्य अमावस्येला वढु बुद्रुक येथे संभाजी राजांची झालेली हत्या ही मराठ्यांच्या पुढील दैदिप्यमान इतिहासाची खरी प्रेरणा ठरलेली दिसते.औरंगजेबाचा अस्त व दिल्लीसह अटकेपार भगवा ध्वज
संभाजीराजांच्या कृर हत्येनंतर ना राजा ना राजधानी, ना सेना ना सेनापती अशा अवस्थेत संताजी, धनाजी व अन्य मराठ्यांनी जी अतुलनीय निष्ठा व शौर्य दाखवीत मुघलशाहीचा इथेच अस्त करीत थेट दिल्लीपर्यंत धडक मारलेली दिसते तो इतिहास केवळ अद्वितीय आहे. इथुन पुढच्या इतिहासात इंदोरचे होळकर, धारचे पवार, ग्वाल्हेरचे शिंदे, बडोद्याचे गायकवाड, नागपूरचे भोसले, तंजावरचे भोसले, पुण्याचे पेशवे या सर्व घराण्यांचा इतिहास अभ्यासणॆ क्रमप्राप्त ठरते. या सर्व घराण्यांनी शिवाजी महाराजांच्या अखेरच्या शब्दांखातर गजाविलेला हा अतुलनीय पराक्रम हाच खरा मराठेशाहीच्या इतिहासाचा सुवर्णबिंदु ठरतो. विशेषत: संपूर्ण भारताची सत्ता एकहाती सांभाळणारे महादजी शिंदे हे तर शिवरायांच्या खालोखाल फ़ार मोठ्या दर्जाचे प्रशासक ठरतात. थोरल्या बाजीरावांचा ऐन पोरवयातला पराक्रम हादेखील म्हणूनच आजदेखील अमेरिकन आर्मीच्या अभ्यासाचा विषय ठरतो.इतिहास वाचायचा कुठे?
हा सर्व इतिहास आम्हाला कुठे वाचायला मिळणार? हा प्रश्न अगदी स्वाभाविक आहे, यावरील उपाय म्हणून आम्ही जितकी जमतील तितकी अस्सल पुस्तके मिळवून , स्कॅन करून, किंवा अन्यत्र उपलब्ध प्रती गोळा करून अभ्यासकांसाठी त्याचा संग्रह करून ठेवलेला आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा व केवळ परीक्षेतच नव्हे तर आयुष्यातही उज्ज्वल यश संपादन करावे हाच त्यामागील शुद्ध हेतू आहे.खालील लिंकवर मराठा इतिहासावरील अनेक भारतीय व परकीय भाषांमधील पुस्तके मोफ़त वाचनासाठी व डाउनलोडसाठी उपलब्ध आहेत. या संग्रहात नित्य नवी भर पडातच आहे त्यामुळे भेट देत रहाणे...
शुभेच्छा!!!
http://www.dasbodh.com/p/blog-page_707.html
No comments:
Post a Comment