Why Should I Vote in the Elections?
![]() |
Why Should I Vote |
- लोकशाहीत मतदानाचा दिवस हा सर्वात महत्वाचा दिवस असतो. या दिवशी सुटी आहे म्हणून पिकनिकला जाणाऱ्यांनी हे लक्षात घ्यावे. ही तुम्हाला तुमचा प्रतिनिधी निवडायची संधी आहे आणि सजगपणे मतदान करणं हे प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे.
- माझा आणि राजकारणाचा काय संबंध असं म्हणण्याची सवय युवावर्गात अनेकांना असल्याचं आपणास दिसेल आणि हा वर्ग ज्या प्रमाणे निराशा दाखवतो त्या प्रमाणेच असाही एक मोठा वर्ग आहे जो निवडणुकीचा दिवस हा पिकनिकचा दिवस मानून चक्क पिकनिकवर जातो.
- आपल्या सारख्या लोकशाही देशात अशा पद्धतीनं निराशा बाळगणारा वर्ग असू नये. घटनेनं आपल्याला जे अधिकार दिलेत त्यात मतदानाचा अधिकार अधिक महत्वाचा आहे. पण आपल्याला तो अगदी सहजपणे मिळाला असल्यामुळे आपण त्याचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
- ब्रिटीश काळापासून निवडणुका होत आहेत हा इतिहास आपणास माहितच आहे. याच ब्रिटनमध्ये प्रारंभी फक्त अमीर-उमरावांना मतदानाचा अधिकार होता. इथं सर्वसामान्यांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आंदोलने झाली. त्यानंतर संघर्ष करुन त्याकाळी जनतेने मतदानाचा अधिकार मिळवला. त्याही वेळी महिलांना प्रारंभी हा अधिकार नव्हता. महिलांनी आंदोलने केल्यानंतर त्यांना हा अधिकार प्राप्त झाला.
- आपल्याकडे आता मतदाराचं वय 18 वर्षे पूर्ण असेल तर मतदानाचा अधिकार आहे. त्यामध्ये कोणताही भेद ठेवण्यात आलेला नाही. मतदानाचा हा अधिकार आपण मान्य करुन मतदानाच्या दिवशी पिकनिक न करता प्रथम मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे.
- आपल्या मतांमधून उद्याचं सरकार निर्माण होत असतं. आपल्या आसपास होणारा विकास आपण या मतदानातून निश्चित करु शकतो. आपणास शिक्षण पद्धती कशा स्वरुपाची हवी याचा निर्णय आपण जसा घेतो तसंच आपण जिथं राहणार आहोत तिथलं सरकार कसं हवं याचाही निर्णय जाणीवपूर्वक आपण घ्यायला हवा.
- आपल्यापैकी अनेकजण निवडणूक प्रक्रियेत कर्तव्य बजावत असणार. मला 'इलेक्शन ड्युटी' आहे असं सांगतात. आपण स्वत:चं मत कसं नोंदवायचं याची संपूर्ण माहिती घ्या आणि आजच आपलं मत नोंदवायची तयारी सुरु करा.
- मतदानाची वाढणारी टक्केवारी लोकशाही सजग आणि मतबूत असल्याचं सिद्ध करीत असते. सर्वांनी निर्धार केल्यावर संपूर्ण भारतात प्रत्येक बालकाला आपण एकाच दिवशी पोलिओची लस देऊ शकतो तर आपण तसाच निर्धार केला पाहिजे म्हणजेच मतदानाची टक्केवारी वाढेल. मतदानाचा दिवस लोकशाहीतील सर्वात महत्वाचा दिवस आहे. या जाणीवेने निर्धार करा आणि सजगतेने आपला मतदानाचा हक्क बजावा, म्हणजे आपल्याला मिळालेल्या या अधिकाराचा खऱ्या अर्थाने सन्मान होईल.
Source: 'महान्यूज'
No comments:
Post a Comment